Friday, March 22, 2013

पत्र पाचवे:अनिश्चिततेचे घटक




दौरा फक्त पाच दिवसांवर आहे. नियोजनावर शेवटचा हात फिरवताना मला अचानक २००१-०२ मध्ये काम करणार्या माझी आठवण झाली. कारण होते, राजौरी-पुलवामा भागांमधून येणाऱ्या काही बातम्यांचे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी काश्मीरला जायचे निश्चित करायचो तेव्हा खरेतर अशा काही गोष्टी चालू असतील तर जावे किंवा न जावे असा प्रश्न पडायचा. वाटायचे की आपल्यावर सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे...अर्थात हे सगळे विचार बाजूला सारून मी जायचो आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकून परतायचो. आजचा विचार केला तर अशी अनिश्चितता मला वाटत नाही. कारण तेव्हा जाणवणारी अनिश्चितता ही 'अनामिका' ची होती, आणि आज त्या 'अनामिका'ला ओळख आहे! हा प्रवासही मोठा विलक्षण आहे. अनेक जण काश्मीरच्या अनिश्चिततेचे घटक आहेत-टाळता न येण्याजोगे.या मधल्या काळात अनेक धडपडी करून त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यामुळे आज त्या विविध अनामिकांना नावं, चेहरे आणि विचार आहेत. त्यांचे विरोधाचे मुद्दे, पद्धती, विचार याही माहिती झाल्या आहेत. त्यामुळेच आधीसारखी अनिश्चितता आज वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, की दहा वर्षांपूर्वी minimum risk ची मक्तेदारी फक्त माझीच होती आणि आज त्या minimum risk मध्ये अजून १०-१२-१५ वाटेकरी आहेत; आणि ही वाढलेली जबाबदारी माझी आहे.

जबाबदारी वाढली की माणसाला समज येते, दुसऱ्या भाषेत प्रौढत्व येतं. पण हे प्रौढत्व कामामधून त्याचा प्राण काढून टाकणारे-अकाली तर नाही ना अशी शंका वाटते. प्रत्येक कामाच्या चार फेजेस असतात.

Concept phase 
Growth phase 
Maturity phase 
Decline phase 

पहिल्या दोन अवस्थांमध्ये कामामध्ये सर्वाधिक गरज असते ती पॅशन आणि exploration ची; नवीन कल्पना, नवीन पद्धती शिकण्याची, समजून घेण्याची आणि बेधडक, बेफिकीर 'नव्या' चा शोध घेण्याची. मॅच्युरिटी फेज मध्ये कामाच्या स्थिरतेचा विचार होतो. आणि म्हणूनच त्याला प्रतिकूल असणारे सर्व घटक, सर्व संभाव्य धोके कमी करण्याचा प्रयत्न होतो. परंतु स्थिरतेमधूनच साचलेपणा येण्याची शक्यता असते. कामामधली पॅशन, इनोव्हेशन हरवून जाण्याची शक्यता असते; आणि मग उरतात त्या फक्त यांत्रिक गोष्टी. कामामधून या गोष्टी जाणं म्हणजेच कामाचा प्राण निघून जाणं; मग साहजिकच चौथ्या आणि शेवटच्या अवस्थेकडे वाटचाल सुरू होते- decline.

काश्मीरचं काम पहिल्या दोन अवस्थांमधून आता तिसर्या अवस्थेपर्यंत पोहोचत आहे. याच वेळी मला ती पहिली पॅशन हरवल्याची जाणीवही होते आहे. कारण risk minimize करताना नवीन धोके पत्करण्याची तयारी दाखवता येत नाही आणि मग नवीन काही गवसतच नाही. याआधी मी काश्मीरला जायचो तेव्हा प्रत्येक वेळी किमान एका नवीन माणसाला भेटायचो, जोडायचो. आताही मी नवीन माणसांना भेटतो पण आता भेटणारा नवीन माणूसही ओळखीतून आलेला असतो; मी जोडलेला नाही म्हणूनच शंका येते की स्थिरतेच्या नावाखाली माझ्यामधली आव्हाने पेलण्याची ताकद आणि ऊर्मी कमी होते आहे. अर्थात काश्मीरचे काम हे फक्त पॅशन वर चालू शकत नाही. ते तसे असते तर आधीच बंद पडले असते.

दुसरे म्हणजे गटाचे अनुभवविश्व आणि कमिटमेंट. गट 'ground zero situation' समजून घेण्यापासून आणि त्या प्रत्यक्ष अनुभवांपासून खूप दूर आहे. अशा प्रकारचे नवीन आणि बेधडक अनुभव मी घेतले म्हणूनच माझी अस्मिता, माझ्या भावना, माझी स्वप्नं, माझा विश्वास काश्मीरशी जोडला गेला. पण माझ्यामधल्या या १००% भावना नवीन गटामध्ये जशाच्या तशा १००% उतरवणार कशा? पुढे-पुढे जाताना त्या हळूहळू कमी कमी तीव्र होत जाणे ओघानेच आले. म्हणूनच प्रत्येकाने असे अनुभव घेऊन ग्राऊंड झिरो समजून घ्यावे, कारण तरच कामावर १००% विश्वास आणि कामासाठी १००% पॅशनेट असलेले कार्यकर्ते मिळतील. असे कार्यकर्ते का गरजेचे?तर काश्मीरचे काम हे प्रत्यक्ष परिस्थितीला हात घालणारे काम आहे. इथे पदोपदी निराशा आणि अविश्वासाचा सामना करावा लागतो-तोही दोन्हीकडचा-काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीकीय चौकटीमुळे त्यांचा आणि ऊर्वरीत भारताच्या पुस्तकी चौकटीमुळे त्यांचाही. म्हणूनच जो काही विचार घेऊन काम सुरू करणे आहे ते 'माझी गरज' म्हणून. मग हळूहळू दोघांनाही ती गरज आपली वाटेल आणि शेवटी त्या गरजेचे काश्मीरच्या गरजेत रूपांतर होईल. ही प्रक्रीया सोपी नाही आणि सहजही नाही. या वाटेवर फुलांपेक्षा काटेच जास्त आहेत. म्हणून काश्मीरचा कार्यकर्ता हा १००% निष्ठावान, स्वत:च्या कामावर १००% विश्वास असणारा पाहिजे. कारण या कामासाठी वेळ, आवड आणि सवडीनुसार काम हे गणित या आधी जुळले नाही अन यापुढेही जुळणार नाही. मग असे कार्यकर्ते मिळवायचे कसे? तात्कालिक प्रश्नावर काम करणारा माणूस जोपर्यंत 'ग्राऊंड झिरो' ला सामोरा जात नाही तोपर्यंत चौकटीतून बाहेर येऊन उत्तरही शोधू शकत नाही...

आणि या सगळ्यांसोबतच महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे-काम अधिक आव्हानात्मक आणि कमी sustainable ठेऊन प्रत्यक्ष प्रश्नाला भिडायचे की उलट अधिक sustainable, सुरक्षित आणि दीर्घकालीन कामासाठी रचनात्मक पद्धती स्वीकारायची?

No comments:

Post a Comment