Monday, April 8, 2013

पत्र सहावे : मी आणि 'माझा' भारत


 मी आणि 'माझा' भारत 
'भारत माझा देश आहे...' शाळेत प्रतिज्ञा म्हणायचो तेव्हा कदाचित शब्दांमागचा अर्थ समजत नसेल...पण आजही? रोज सकाळी ऑफिसमध्ये जातो आणि स्वत:लाच विचारतो की मी इथे का आहे? गडचिरोली, सिक्कीम, आसाम, दांतिवाडा, शोपियान सारखी नावं आणि तिथली अस्थिर परिस्थिती 'माझ्या' भारतातली असूनही मी माझं करियर, माझं स्टेटस, माझी स्टॅबिलिटी यांनाच का कुरवाळत बसायचं? पहिला 'मी' आणि दुसरा 'मी' यांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. दुसरा 'मी' पणा म्हणजे संकुचित स्वार्थ आणि 'माझा भारत' म्हणजे स्वार्थाचा वाढता परीघ अपेक्षित आहे. माझ्या भारताला पोखरणार्या दहशतवाद, भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्ती बघून माझं मन हळहळतं, सैद्धांतिक वाद घालतं आणि चहासोबत माझं भारतीयपण संपूनही जातं, असं का? जेव्हा या घटना वाचून, समजूनही कोणालाच उमजत नाहीत तेव्हा निराश वाटतं, चीड येते. कोणताही सर्वसामान्य 'मी' त्याविरोधात काही करायला धजत नाही; पण तरीही या गोष्टी बदलल्या पाहिजेत असे आग्रहाने म्हणतो. आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहून सगळे 'मी' अलिप्तपणे निरिक्षणे नोंदवतात, निष्कर्ष काढतात, समीक्षा करतात पण होणार्या अन्यायामुळे, बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे कोणीच पेटून उठत नाही, अस्वस्थ होत नाही...आणि तरी आम्ही बसतो आणि चढाओढीते 'राष्ट्रीय एकात्मतेची' चर्चा करतो. दिसणारे प्रश्न मनाला भिडत नसताना, अस्वस्थता वाटून कार्यप्रवण होण्याची इच्छाही होत नसताना ज्या राष्ट्राच्या एकात्मतेबद्दल आपण बोलतो, त्या राष्ट्राची नक्की कोणती मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी असते?

एवढा अस्वस्थ होऊन लिहितो आहे याला दोन घटना कारणीभूत आहेत. एक म्हणजे आत्ता काश्मीरला गेलो असताना हुर्रियतचे दोन तरुण कार्यकर्ते भेटायला आले. अनेक प्रकारांनी त्यांनी हे मांडायचा प्रयत्न केला की काश्मीरवरचा भारताचा ताबा बेकायदेशीर आहे. रात्री १० ते १२:३० असा अडीच तास आमचा वाद झाला. दोघांनीही काश्मीरच्या इतिहासाचे दाखले देण्याचा प्रयत्न केला, पण दोघांपाशी असणारी माहिती अर्धवट होती. त्यामुळे त्यांना योग्य माहिती आणि घटनाक्रमाची जाणीव करून दिल्यावर दोघांनीही आपला अभ्यास कमी असल्याचे मान्य केले. त्यांच्याच बोलण्यात आलेला एक संदर्भ आपणासाठीही देतो-काश्मीरच्या भारतातील सामिलीकरणाबद्दल बोलताना जुनागढचे उदाहरण कायम दिले जाते. तसेच याहीवेळी या दोघांनी तशी तुलना केली. तेव्हा जुनागढची डेमोग्राफी, तेथील राजकारण व राजाची भुमिका विरुद्ध काश्मीरमधील डेमोग्राफी, गुलाम अब्बास चौधरी आणि शेख अब्दुल्ला यांची सत्तास्पर्धा, तसेच जम्मु काश्मीर राज्य म्हणजे केवळ खोरे नाही तर जम्मु, काश्मीर व लडाखचा भाग या वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांच्या संख्येचे योग्य ते उत्तर त्यांना दिले.

मी आज आपणापैकी प्रत्येकाला हा प्रश्न विचारला की जर जुनागढबाबत भारताने घेतलेली भूमिका न्याय्य असेल तर काश्मीरबाबत पकिस्तानने घेतलेली भूमिका अन्याय्य कशी ठरू शकते? -तर ९५% टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देवू शकणार नाहीत. कारण काश्मीरसारख्या देशाच्या सीमाप्रश्नांबद्दलही आपण वाफाळलेल्या चहासोबत गप्पा मारतो आणि आवड आणि ज्ञान वाढावे म्हणून पुस्तके वाचतो-बास! पण हे प्रश्न आपल्या मनाला भिडत नाहीत. जेव्हा देशासमोरील प्रत्येक प्रश्न हा 'माझा प्रश्न' आहे असे वाटेल तेव्हाची अस्वस्थता तुम्हाला देशप्रश्नावर काम करण्यापासून परावृत्त होऊ देणार नाही.

दुसरी अस्वस्थ करणारी घटना बारामुल्लाच्या भेटीत समजली. अॅन्टी टेररीस्ट स्क्वॉड च्या मेजरशी चर्चा झाल्यावर बाकी गट पुढे गेला तेव्हा त्याने नुकतीच घडलेली एक घटना मला सांगितली. सोपोरला एका घरामध्ये दोन अतिरेकी लपले असल्याचे समजताच लष्कराने योग्य त्या कारवाईला प्रारंभ केला.आता आपण नक्कीच मारले जाणार हे समजल्यावर त्या दोघांनी शरणागती पत्करण्याची ईच्छा व्यक्त करून चर्चेसाठी लष्कराच्या एका कॅप्टनला आत बोलावले. एक कॅप्टन आणि एक जवान चर्चेसाठी आत जाताच दोघा अतिरेक्यांनी या दोघांचा जळा कापून त्यांना मारून टाकले, आणि ''अन्याय करणार्याला संपवून आम्ही आमचा जन्म सार्थकी लावला'' असे म्हणत स्वत:लाही संपवले...

    पहिल्या आणि दुसर्या दोन्ही प्रसंगातून अधोरेखित करायचे आहे ते त्यांच्या ध्येयवेडेपणाला, अस्वस्थ वाटून कार्यप्रवण होण्याच्या त्यांच्या वृत्तीला, जे काही काम करतो आहोत त्याच्यावरच्या विश्वासाला आणि ते पूर्ण करण्याच्या जिद्दीला. आज अनेक संस्थांमार्फत युवा गटाचे संघटन करण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.पण दु:ख या गोष्टीचे वाटते की त्यांच्यापैकी अगदी हातावर मोजता येईल इतक्याही तरुणांना प्रत्यक्ष प्रश्नाला भिडून काम करावेसे वाटत नाही; याचे कारण म्हणजे अंत:प्रेरणेचा अभाव -अजूनही मला भारत 'माझा' वाटतच नाही. जर 'एकात्म मातृभूमी' आपले ध्येय आहे असे आपण म्हणतो तर त्याप्रत आपण नक्की कसे पोहोचणार आहोत?ती खडतर वाटचाल करण्याची आपली तयारी आहे का? मी असे म्हणत नाही की हे ध्येय गाठण्यासाठी शस्त्र हातात घावं;पण मी फक्त वाचून सोडून देणार असेन , अस्वस्थ वाटूनही प्रत्यक्ष प्रश्नाला कोणीच भिडणार नसेल , परिस्थिती समजून घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न कोणी करणार नसेल तर 'एकात्म राष्ट्राचा विचार' निरर्थक आहे. खरे पाहता अशा प्रकारे अस्वस्थ होणारी मने म्हणजेच मागील पत्रात म्हटल्याप्रमाणे १००% समरस हो ऊन, १००% निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते. असे कार्यकर्ते मिळत नाहीत, मने अस्वस्थ होत नाहीत म्हणजेच योग्य ध्येयप्रेरणा जागृत करताना आपण कमी पडत आहोत का?

No comments:

Post a Comment