Saturday, April 19, 2014

पत्र सातवे: नेतृत्त्वाचे अवलोकन


नेतृत्त्वाचे अवलोकन 

 दि. १०.०५.२०१०


     काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये सईद अली सहा गिलानींचा एक नातेवाईक भेटण्यासाठी आला होता. एप्रिलच्या दौऱ्यादरम्यान IT Seminar मध्ये काश्मीरमध्ये आणखी एक  IT Company सुरू करण्यासंदर्भात बोलणे झाले होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तो चर्चेसाठी आला होता. तो स्वतः सध्या श्रीनगर मध्ये असतो; त्याचा एक भाऊ बेंगलोर आणि दुसरा दिल्लीमध्ये याच क्षेत्रात कार्यरत आहे. असेच काहीसे बोलणे चालू असताना कौसरचा SMS आला - 
                   "Huriyat calls for Kashmir Bandh against
                    death sentence of two Kashmiris by Delhi
                    court...JKLF supports the call..."
आणि लगेचच लाल चौकाच्या आसपास दगडफेकीच्या आणि लष्कराकडून होणाऱ्या लाठीचार्जच्या बातम्याही पाठोपाठ येऊ लागल्या. एप्रिलच्या दौऱ्याच्या  दरम्यान जवळपास प्रत्येकाने लाल चौक शांत,सुरक्षित आणि सामान्य असल्याचा अनुभव घेतला होता. पण तो आता भास ठरावा असे अशांततेचे, अव्यवस्थेचे सावट लाल चौकात होते - जे TV वरून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत; पेक्षाही मनामनापर्यंत पोहोचत होते… 



     आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये हा विषय निघताच तो थोडासा अस्वस्थ झाला आणि मला म्हणाला की 'याच गिलानींचा एक मुलगा UK ला तर दुसरा Canada मध्ये आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ते आणि त्यांचे कुटुंब कायमच सुरक्षित आहे. खरा करपतो तो सामान्य माणूस. आपल्या आप्तेष्टांना या चढउतारांपासून दूर ठेवून हे नेते. आपण ज्यांच्यामुळे नेते बनलो अशांच्या पोराबाळांना धोक्यात टाकतात, हा कोणता न्याय?'


     पुढे तो असंही म्हणाला की एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे काश्मिरी तरुण दिशाहीन आणि ध्येयहीन आयुष्य जगात आहे. तरुणांच्या मनातील हीच अस्वस्थता त्यांना हिंसक कृतीकडे वळवताना दिसते अहे. या सर्वातून बाहेर पडून काश्मीरचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी समाजपरिवर्तनाची गरज आहे. याच मुद्द्यावर आमचे बोलणे संपले, तो निघून गेला, पण माझे विचारचक्र सुरु झाले… 


     काश्मीरमध्ये सरकारबद्दल, सरकारी अकार्यक्षमतेबद्दल असंतोष आहे, चीड आहे. शोपियानच्या वेळी संपूर्ण काश्मीर बार आसोसिएशन ने भारतविरोधी पवित्र घेतला. Separatist नेत्यांच्या मनात भारत सरकारविषयी  आणि आता न्यायपालिकेविषयी असणारी अढी नवीन नाही. पण या सरकारविरोधी भावनेमध्ये केवळ system विरुद्धचा राग समाविष्ट नाही तर त्यासोबतच 'आझादी' ची ओढ, आंतरराष्ट्रीय रस, दाबले गेल्याची भावना, आपल्याला फसवले गेल्याचा ग्रह, परिस्थितीविषयीचे सापेक्ष ज्ञान विवादास्पद मुद्दा असल्याने 'मानवाधिकार आयोगा' ची भूमिका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परकीय सरकार असल्याचा राग या आणि अशा अनेक गोष्टी परिणामकारक आणि परिस्थितीचा गुंता करण्यात समान हिस्सेदार ठरतात. शिवाय विरोधासाठी अहिंसक पद्धतीऐवजी कायमच हिंसक पद्धत वापरली जात असेल तर या गुंत्यामध्ये भरच पडते. भ्रष्टाचारी, पिळवणूक करणाऱ्या परकीय सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंसक आवाज उठवणे अपरिहार्य मानले जाते आणि त्यामुळे अशी परिस्थिती अधिक नाजूक बनते. म्हणूनच एखादी घटनाही संपूर्ण काश्मीरला क्षणार्धात अस्थिर आणि अशांत करू शकते. 


     दिल्लीच्या न्यायालयाने दोघा काश्मिरींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उमटलेल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून उपरोल्लेखित सर्व घटक काश्मीरची परिस्थिती कधी घडवतात हे कोणाही अभ्यासकाला वेगळे सांगणे नको. पण काश्मीरची परिस्थिती कधीच ठोकताळ्यात बसवता येत नाही तशीच याहीवेळी ती दिलेल्या परिमापकांमध्ये मोजून मापून पाहता येणार नाही. 


     अलीकडेच लाल चौकामध्ये एका मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीत बसमधून प्रवास करणाऱ्या एका ४० वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला - ज्याचा या मोर्चाशी कोणताही संबंध नव्हता. एरवी Army  किंवा इतर फौजांकडून घेतलेल्या 'action' ची खरमरीत बातमी छापणाऱ्या Greater Kashmir ने या बातमीला मात्र फारसे महत्त्व दिले नाही. अर्थात या प्रसंगामुळे 'आम्ही प्रथम हिंसेचा मार्ग स्वीकारत नाही, लष्करी बळाच्या आणि सरकारच्या दबावाला आणि दडपशाहीला विरोध म्हणून आम्ही हिंसेचा मार्ग पत्करतो.' असे  separatists कडून नेहमी केले जाणारे दावे फोल ठरले. पण या बातम्यांना ऊर्वरीत भारतातील आणि काश्मीरमधील माध्यमांकडून कशा प्रकारे मांडले जाते यावर सामान्य माणसाचे मत आणि ग्रह अवलंबून असतात. काश्मीरमधील अस्थिरता, ताणताणाव, हिंसा यांच्याबद्दल हिरीरीने coverage देणारे media वाले ज्या गोष्टीला खरे महत्त्व दिले पाहिजे त्याकडे सोयीस्कर काणाडोळा करतात. लोकांना जे आवडतं  ते आम्ही छापतो / दाखवतो. या कारणापुढे लोकशाहीचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ 'राष्ट्रीय हित', 'राष्ट्रीय विचार' यांना विसरत चालला आहे आणि माध्यमांची ही उदासीनता भारतामध्येच असेल तर मुळातच अलिप्तता जपणाऱ्या काश्मीर आणि काश्मिरींमध्ये असे विचार रुजवण्याचा प्रयत्नच अवास्तव नाही का? 


     उर्वरित भारतामध्ये बव्हंशी सामान्य माणूस हा मध्यममार्गी असतो. त्याचे राजकीय विचार जहाल नसतात. पण काश्मिरी माणसाच्या राजकीय भावना सर्वाधिक तीव्र असतात. याचा एक परिणाम म्हणून समजाचे नेतृत्व म्हणून केवळ राजकीय नेत्यांकडेच पाहिले जाते. समाजसेवा,संशोधन,कला,क्रीडा अशा क्षेत्रातील व्यक्तींकडे समाजाचे नेतृत्व म्हणून पाहिलेच जात नाही. दुखः या गोष्टीचे की प्रत्येक राजकीय नेतृत्व हे संधीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग,एखाद्या घटनेचे स्वार्थासाठी भांडवल, शिफारशी यातच गुरफटून राहते; आणि सामान्य माणूस त्याच्या विकासापासून एक तर लांब राहतो किंवा विघातक मार्गाने आभासी विकासाचा एक भाग बनतो. मग असे असताना काश्मीरचे काम विस्तारण्याबाबत विचार करताना विधायक राजकीय नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे का?


     अर्थातच कोणत्याही दीर्घकालीन कामासाठी priority ठेवणं नेहमीच महत्त्वाचं. पण काश्मीरमधली परिस्थिती इतकी विलक्षण आहे की क्षणाक्षणाला बदलते; इतकी की दौऱ्याच्यावेळी रात्री ११-११:३० पर्यंत फिरताना ज्या लाल चौकाला शांत पहिले होते, तोच लाल चौक एका मोर्चादरम्यान अवघ्या १५ मिनीटात रक्तरंजित होतो. रस्त्यावर उतरून घोषणा देणारे, अर्धसत्य सांगून चिथावणारे नेते अशावेळी मूग गिळतात आणि पुढच्या संधीची वाट पाहत डोळ्यावर कातडं ओढून गप्प बसतात, आझादीची भाषा बंद पडते…या चक्रातून बाहेर कसे पडायचे? (या सगळ्या निराशेच्या काळ्या ढगाला सोनेरी किनार म्हणजे या प्रकारानंतर National Conference ने मोर्चा काढला, मोर्चाला प्रतिसादही चांगला होता. ज्यामध्ये दगडफेक थांबवून Separatists नी विकासात लक्ष घालावे अशी मागणी केली गेली . १९९६ नंतरचा हा अशा प्ररकारचा पहिला मोर्चा होता.)


     म्हणूनच काश्मिरमधल्या नाजूक परिस्थितीतून तेथील सामान्य माणसाला बाहेर काढायचे असेल, विकासाकडे न्यायचे असेल तर ते सहभागातूनच साधता येइल. आपल्याभोवती परिस्थितीने आणि जाणीवपूर्वक विणल्या गेलेल्या कोशाच्या बाहेर पडूनच त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल आणि निरपेक्ष विचार करता येइल. परंतु तो आजही ज्यांच्यामागे धावत आहे असे काश्मीरचे नेते एकांगी विचार करत आहेत का? या विचारला सर्वसामान्यांचा पाठींबा मिळावा म्हणून विचारांमध्ये romanticism मिसळून परिस्थितीचा आभास निर्माण केला जात आहे का? आणि असे असेल तर या परिस्थितीतून सामान्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना सारासार विचार करून 'विवेकी' आणि 'प्रगल्भ' बनवण्यासाठी, विकासाकडे प्रेरित करण्यासाठी नेमके कोणत्या दिशेने प्रयत्न करावे लागतील?


                                                                                       आपला,
                                                                                        सारंग गोसावी 

No comments:

Post a Comment